
मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना गटशिक्षणाधिकारी यांचे आवाहन
अमळनेर : शासनाच्या १०० दिवसाच्या कृती कार्यक्रमाचे गांभीर्य घ्या आणि १५ एप्रिलपर्यंत आपल्या उणिवांचे निरसन करा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना केले. १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आयएमए हॉल मध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

रावसाहेब पाटील पुढे म्हणाले की गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने सात कलमी कार्यक्रम राबवा. अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी द्या ,वरवर भेटी देऊ नका मुलांचे चाचणीचे पेपर घ्या त्याच प्रश्नोत्तरांची पडताळणी घ्या. लेखनावर जास्त भर द्या. अधिकाऱ्यांनी कोणालाच वाचवण्याचा प्रयत्न करू नका. मुलांच्या आरोग्य सुविधांवर लक्ष द्या. अपार आयडी , आधार अपडेट करा.
प्रास्ताविक केंद्र प्रमुख शरद सोनवणे यांनी केले. कृती आराखडा वाचून दाखवला. शाळेत दररोज राज्यगीत म्हटले गेले पाहिजे ,वर्षभर हर घर संविधान अभियान राबवणे , मराठी भाषा प्रभावी अंमलबजावणी , महावाचन , कॉपी मुक्त अभियान , आनंददायी शनिवार यासंदर्भात माहिती दिली.
यावेळी गटसमन्वयक रवींद्र पाटील , केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंखे ,अशोक सोनवणे , किरण शिसोदे ,दिलीप सोनवणे ,राजेंद्र गवते , प्रवीण वाडीले ,ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह १३३ मुख्याध्यापक हजर होते.




