
माजी मंत्री अनिल पाटील यांचे आवाहन
अमळनेर : बाजार समिती ही शेतकरी व्यापारी आणि हमाल, मापाडी, गुमास्ता या घटकांवर चालते. शेतकऱ्यांनी ठेवलेल्या विश्वासाचे सार्थक होऊन बाजार समिती नफ्यात आली. शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण केले पाहिजे बाजार समिती आधुनिकतेकडे जायला पाहिजे अशी अपेक्षा माजी मंत्री अनिल पाटील यांनी बाजार समितीतर्फे आयोजित पुरस्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केली.
अनिल पाटील यांनी माजी संचालक आणि आजी संचालक यांची तुलना करताना सांगितले की, पूर्वी बाजार समितीत कलाकंद खायचे, भजे घरी बांधून न्यायचे आता पद्धत बदलली आहे.
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आयोजित शेतकरी सभासद सन्मान सोहळ्यात सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दिपप्रज्वलन आ.अनिल पाटील ,माजी जि प सदस्या जयश्री पाटील, सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील यांचे हस्ते करण्यात आले. समारंभाच्या प्रास्ताविकात सभापती अशोक पाटील यांनी बाजार समितीला कर्जातून बाहेर काढून कोट्यावधींच्या शिलकीपर्यंत संचालक मंडळाने आणले असून पुढील काळात बाजार समितीवर कोणताही आर्थिक बोजा न पडू देता शेकडो गाळ्याचे काम विकासकाच्या माध्यमातून बीओटी तत्वावर करून घेणार असल्याचे जाहीर केले. बाजार समिती आर्थिक दृष्ट्या भक्कम करणे व सभासद शेतकऱ्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी आम्ही कार्यरत आहोत असे सांगितले.
सभेचे सूत्र संचालन अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी केले. अमळनेर तालुक्यातील उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषिरत्न पुरस्कार देऊन तर शेतकरी प्रश्नावर लढणारे गावरान जागल्या सेनेचे लढवय्ये शेतकरी कार्यकर्ते यांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रथमच उत्कृष्ट खरेदीदार , उत्कृष्ट आडतदार, उत्कृष्ट हमाल, उत्कृष्ट गुमास्ता ,उत्कृष्ट कृषी उद्योजक आदी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी उत्कृष्ट ग्रामविकासाचे काम करणाऱ्या गावांना आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार, शेतकऱ्यांना पतपुरवठा करणाऱ्या संस्थांना आदर्श विकास सोसायटी पुरस्कार, तसेच आदर्श ग्रामसेवक व आदर्श गट सचिव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एमपीएससी परीक्षा पास करणारे रोहित भगवान कंखरे व शुभांगी भगवान कंखरे या भावंडांनाही यावेळी यशोदीप पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट असे आदिवासी नृत्य पथकाचा हि सन्मान स्मृती चिन्ह देऊन यावेळी करण्यात आला.
आभार प्रदर्शन उपसभापती सुरेश पाटील यांनी केले.याप्रसंगी मंचावर डी डी आर गौतम बलसाने यांचे सह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ अनिल शिंदे, प्रा.सुभाष पाटील, हिरालाल पाटील,डॉ.अशोक पाटील, भोजमाल पाटील, समाधान धनगर, सुषमा देसले, पुष्पा पाटील, नितीन पाटील,भाईदास भिल, प्रकाश अमृतकार , ऋषभ पारेख, शरद पाटील आदी संचालकांसह माजी प स सभापती शाम अहिरे, माजी जि प सदस्य ऍड व्ही आर पाटील,अनिल शिसोदे ,शिवाजीराव पाटील, मुक्तार खाटीक, विनोद कदम , इमरान खाटीक, बाळू पाटील आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शिवव्याख्यानात बोलताना शिवव्याख्याते प्रा.डॉ. लिलाधर पाटील यांनी सांगितले की,छत्रपती शिवाजी महाराज यांनी जाती-धर्मापलिकडे जाऊन रयतेचा विचार केला. शिवरायांच्या जनकल्याणाच्या व मानवतेच्या विचाराचा शत्रुनेही सन्मान केला हे इतिहास सांगतो. शिवरायांनी फक्त किल्ले उभारून नाही तर मावळे आणि माणसे उभारून स्वराज्य निर्माण केले.
मार्केट परिसरात नव्याने तयार केलेले गुमास्ता कट्टा तसेच व्यापारी भवनाचे लोकार्पण आणि शेतकरी प्रेरणा स्मारकाचे तसेच नविन व्यापारी गाळेचे भूमिपूजन याप्रसंगी आ अनिल भाईदास पाटील, जयश्री अनिल पाटील, सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.उन्मेष राठोड, उपसचिव अशोक वाघ, सहसचिव सुनील सोनवणे, लेखापाल योगेश महाजन यांनी परिश्रम घेतले.




