
अंत्ययात्रा काढून साऱ्या गावाने पाळले 12 दिवसाचे सुतक…
अमळनेर : चार महिन्यांपासून तालुक्यातील तळवाडे गावात मुक्काम ठोकणाऱ्या वानराचा मृत्यू झाल्याने गावाने हळहळ व्यक्त केली. विधीप्रमाणे अंत्ययात्रा काढून साऱ्या गावाने १२ दिवसाचे सुतक देखील पाळले आहे.

तळवाडे येथे नर आणि मादी अशी दोन वानरे चार महिन्यांपूर्वी गावात आली. गावकऱ्यांना सुरुवातीला भीती वाटत होती. नंतर मात्र त्यांचा लळा लागला. ज्याला वाटेल तो त्यांना खाऊ घालत होता. घरांवरून ,झाडावर ,पाण्याच्या टाकीवर उड्या मारत असताना मुलांना गंमत वाटायची. १२ रोजी एक वानर पाण्याच्या टाकीवर चढले आणि उड्या मारत होते. अचानक ते खाली पडले त्याच्या डोक्याला मार लागला. गावकऱ्यांनी त्याला उचलून बाजूला केले आणि झाडी येथून पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारासाठी बोलावले. मात्र तत्पूर्वी वानराचा मृत्यू झाला होता. गाव हळहळले आणि वानराची विधिवत अंत्ययात्रा काढण्याचे ठरले. डोली सजवण्यात आली. वानराची अंघोळ घालून त्याला तिरडीवर ठेवण्यात आले. गावात रांगोळ्या टाकण्यात आल्या होत्या. फुलांचा वर्षाव केला जात होता. वाजत गाजत वानरराजाला निरोप देण्यात आला. धीरज रामकृष्ण पाटील , आणि योगेश पवार आगारी बनले. रोहिदास हिरामण पाटील , भटू देविदास पाटील , ,संजय शालीक पाटील ,संदीप रवींद्र पाटील , स्वप्नील छोटू पाटील खांदेकरी बनले. पूजा व विधी करून अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्याप्रमाणे कुटुंबातील कोणी गमावले तर एका महिलेला दुःख देण्यात येते. त्याचप्रमाणे वेणूबाई पाटील या महिलेने दुःख स्वीकारले. परंपरेप्रमाणे भावकी एकत्र येऊन त्या कुटुंबाच्या घरी १२ दिवस जेवायला येते. त्याचप्रमाणे गावकरी मंदिरावर येऊन एकत्र जेवतात. गावाने १२ दिवस सुतक पाळले आहे. २२ रोजी दशक्रिया विधी तर २४ ला उत्तरकार्य आणि गंधमुक्तीचा कार्यक्रम देखील करण्यात येणार आहे. आमदार अनिल पाटील यांनीही दुःख व्यक्त केले तर पंस चे माजी उपसभापती भिकेश पाटील यांनीही अंत्ययात्रेला हजेरी लावली.




