
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान जय जवान जय किसानचा नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांची जयंती राज्यशास्त्र विभाग संयुक्तपणे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वसंत देसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजमीन पठाण ह्या स्वयंसेविकेने केले. प्रास्ताविक एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी.टी. कदम यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वसंत देसले यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. एम.के. वाघमारे उपस्थित होते. त्यांनी व्याख्यानात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून त्यांनी देशासाठी केलेले त्याग आणि समर्पण हे गुण अंगीकारल्यास देश खऱ्या अर्थाने महासत्ता होऊ शकेल,असे मत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे प्रा.व्ही. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सत्य आणि अहिंसा यावर मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर महाविद्यालयाच्या परिसरातील स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच एन.एस.एस. स्वयंसेवक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नाजमीन पठाण हिने केले. सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.




