
साहित्य, संस्कृती, कृषी व राष्ट्रीय एकात्मता जोपासणाऱ्या गझलेचा आस्वाद घ्या -प्रा.डॉ. सदाशिव सूर्यवंशी
अमळनेर:- पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन दि.२७ व २८ जानेवारी २०२४ शनिवार व रविवार रोजी अमळनेर येथे संपन्न होणार असून सामाजिक आरसा बनून साहित्य, संस्कृती, कृषी व राष्ट्रीय एकात्मता जोपासणाऱ्या गझलेचा सर्वांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खान्देश साहित्य संघ आयोजित गझल संमेलन मातृहृदयी सानेगुरूजी साहित्य नगरीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार असून दोन दिवशीय होणाऱ्या गझल संमेलनात देशभरातून शेकडो गझलकार सहभागी होतील, असेही प्रा.डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.२७ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल व ११:०० वाजता गझल संमेलनातील प्रथम सत्रास सुरूवात होवून दिवसभरात 8 गझल सत्र होतील. दुसऱ्या सत्रात गझल सादरीकरणाबरोबर गझलेचा प्रवास, लेखन व भविष्य या विषयावर परिसंवाद होईल. तर रात्री ८:०० ते १० गझलगायन मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी २८ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजता गझल सत्रास सुरूवात होवून ८ सत्रात गझल सादरीकरणासह एक परिसंवाद व सायंकाळी ६:०० वाजता समारोप कार्यक्रम होईल. सदर गझल संमेलनात गझल साहित्यकृतींचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे. यासोबतच विविध साहित्यकृतींचे ग्रंथ प्रदर्शन व विक्री उपलब्ध असेल.
मातृहृदयी साने गुरूजी साहित्य नगरी देशभरातील गझलकारांच्या सहयोगाने साकार होणार आहे. गझलेचा प्रवास फारसी, अरबी, उर्दू, हिंदी, मराठी ते आहिराणी कसा झाला ? याचे दर्शन देखील याठिकाणी होईल. आहिराणी भाषेतही गझल लेखन केले जात असून खान्देशी साहित्यातील हा नवा साहित्यप्रकार रसिकांसाठी खान्देशी मेजवानी देणारा असणार आहे. खान्देश साहित्य संघाव्दारा आतापर्यंत अहिराणी व तिच्या उपभाषांच्या माध्यमातून असंख्य साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात आले असून गझलसम्राट सुरेश भटांनी जी मराठी गझल रूजवली तिचा प्रवास बोलीभाषेतूनही प्रगल्भतेने फुलतो आहे यासाठी खान्देश साहित्य संघाने पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन घेवून खान्देशात साहित्यिक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
साने गुरूजी म्हणायचे… खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे… या विश्व बंधूतेच्या विचारांना पुढे नेण्यासाठी गझलकारांनी पुढाकार घेतलेला आहे. मराठी भाषेसह विविध बोलीभाषेत लेखन करणारे गझलकार सहभागासाह लोकवर्गणीतून हे संमेलन घडवित आहेत. साहित्य चळवळीतील हा अनोखा उपक्रम सर्वाच्या कुतूहलाचा विषय झाला आहे. मागील चार संमेलनांमध्ये तीन दिवस चालणाऱ्या गझल कट्टाला तीन तासांचाच अवधी ठेवल्यामुळे पुरेशी संधी शिल्लक नाही. लोकांच्या काळजाला भिडणारा साहित्यातील काव्यप्रकाश गझल आहे. नव्या पिढीने सशक्तपणे गझलेचा सुरू केलेला प्रवास पाने, फुले किंवा प्रेयसी या विषयांच्या पलीकडे जाऊन सामाजिक भान जोपासत वेगवेगळ्या विषयांना हाताळणारा दर्जेदार व लोकपसंतीला उतरलेला साहित्य प्रकार आहे.म्हणून सर्व साहित्यिकांनी एकत्र येत भाषा समृध्दी व साहित्य प्रवाहाला पुढे घेवून जाण्यासाठी गझल संमेलन घेण्याचा निर्णय घेतलेला असल्याचे डॉ सूर्यवंशी यांनी सांगितले. मराठी भाषेत लेखन करणाऱ्या तमाम गझलकारांना संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने संवादाच्या भूमिकेतून प्रतिपंढरपूर म्हण्णून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर शहरात पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन होत आहे. हे संमेलन गझलेच्या इतिहासातील नवे पाऊल ठरणार आहे. साहित्यिकांनी गझल नावाच्या साहित्य प्रकारासाठी उभारलेले नवे विचारपीठ देशभरातील गझल लेखकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणाऱ्या गझल संमेलनात दोन दिवस उपस्थित राहून गझल सादरीकरण, परिसंवाद, गझल गायन मैफिल, ग्रंथ प्रदर्शन व प्रकाशन अशा कार्यकमांचा आनंद घ्यावा व मराठी भाषेसह बोलीभाषांच्या समृध्दीसाठी या संमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बोधचिन्हाचे अनावरण…

खान्देश साहित्य संघ आयोजित पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण यावेळी करून संमेलनाविषयी माहिती देण्यात आली. याप्रसंगी डॉ कुणाल पवार, रामकृष्ण बाविस्कर, सुनिता पाटील,रत्नाकर पाटील, दत्ता सोनवणे,शरद पाटील, अशोक इसे, छाया इसे,शरद धनगर, संजय साळुंखे, उमेश काटे यासह विविध गझलकार साहित्यिक उपस्थित होते.




