
ठेकेदाराच्या चुकीमुळे विनाकारण प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रकार…
अमळनेर:- बांधकाम कामगार आणि मजुरांना भांडे वाटण्याच्या योजनेत सुसूत्रता नसल्याने महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. विनाकारण प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रकार झाला. ठेकेदाराकडे यंत्रणा नसेल तर त्याचा ठेका रद्द करून मजुरांना न्याय देण्याची मागणी होत आहे.
इमारत व बांधकाम मजुरांसाठी शासनाने संसारोपयोगी ३० भांडे फक्त एक रुपयात देण्यात येत आहेत. त्यासाठी कामगाराकडे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र आवश्यक आहे. यासाठी भडगाव येथील फयाज शेख याना कंत्राट देण्यात आला आहे. कंत्राटदाराने सर्व लाभार्थ्यांना काही दिवसांपूर्वी भडगाव येथे बोलावले होते. त्यावेळी अवकाळी गारपिट झाली होती. त्यात मजुरांचे हाल झाले. नंतर मजुरांना शनिवारी अमळनेर येथे बोलावण्यात आले. शनिवारी कंत्राटदाराने मंत्री अनिल पाटील यांच्या बंगल्यावर वाटपासाठी यंत्रणा मागितली. काही लोकांना टोकन दिले आणि नंतर वाटप बंद केली. त्यावेळी महिलांनी संताप व्यक्त केला. तेथून महिलांना मंगळवारी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मजुरांना भांडे वाटप केले जातील असे सांगण्यात आले. सोमवार रात्रीपासून बाजार समितीत अनेक महिला मुक्कामी होत्या. सकाळी सुमारे ५०० ते ६०० मजूर बाजार समितीत जमले होते. बाजार समितीत ठेकेदार येत नाही म्हणून काही महिला तहसील कार्यालयाच्या बाहेरच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करू लागल्या. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी कामगार उपायुक्त जितेंद्र पवार यांच्याशी बोलणे करून या प्रकरणाची गंभीर दखल घ्यायला सांगितली. तरी महिला ऐकण्याच्या स्थितीत नव्हत्या. पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद बोरसे , सिद्धांत शिसोदे यांनी महिलांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.




