
ना. अजित पवारांनी डॉ. आंबेडकर चौकात महिलांशी साधला संवाद तर सफाई कामगारांसोबत घेतले भोजन
अमळनेर-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंवाद यात्रेचे काल अमळनेरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.कलागुरु मंगल कार्यालया जवळील प्रवेश द्वाराजवळ जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली,तेथून भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली.
यावेळी जनसंवाद यात्रेच्या रथावर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे,मंत्री अनिल पाटील,महिला प्रदेशाध्यक्ष सौ रुपाली चाकणकर,आ अमोल मिटकरी तसेच माजी नगराध्यक्षा सौ जयश्री पाटील विराजमान होत्या.माजी आ कृषिभूषण साहेबराब पाटील यांच्या राजभवन निवासस्थानी आल्यावर त्यांचा नातू व मुलगा धिरेंद्र पाटील यांनी स्वागत केले. अजित पवारांच्या स्वागताचे फलक संपुर्ण शहरात झळकल्याने संपूर्ण शहर गुलाबी झाले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात यात्रेचे जोरदार स्वागत झाले तेथे बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण झाले.तर माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव व त्यांचे सहकारी आणि महिला भगिनींनी अजित पवार यांच्या गळ्यात जेसीबी द्वारे मोठा हार टाकून स्वागत केले.
महिला सबलीकरणसाठी लाडली बहीण योजना
याठिकाणी मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित असल्याने त्यांच्याशी संवाद साधताना ना अजित पवार म्हणाले की लाडली बहीण योजनेस सगळीकडे उस्फुर्त प्रतिसाद व स्वागत होत असून सर्वच ठिकाणी महिलांकडून राख्या बांधल्या जात आहेत,येत्या राखी पौर्णिमाला सर्वाना पैसे मिळणार आहे,विशेष म्हणजे सर्व जाती धर्माच्या बहिणींना पैसे मिळणार असून महिला सबलीकरण साठी हा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे,परंतु विरोधक कारण नसताना टीका करताय,परंतु योजना सुरू ठेवायची असेल तर येत्या निवडणूकित महायुतीचेच सरकार आणा असे आवाहन करीत संविधान आणि घटनेचे आम्ही पाठीराखे आहोत असे त्यांनी आवर्जून सांगितले.
सुभाष चौकातील सुभाष बाबूजींच्या पुतळ्यास व त्यानंतर अर्बन बँकेसमोर सानेगुरुजी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण झाल्यानंतर इंदिरा भुवन येथे सफाई कामगारांसोबत त्यांनी स्नेह भोजन घेतले.कामगारांनी त्यांचे यथोचित स्वागत व सत्कार केला.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाजवळ स्वागत व शिवरायांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून प्रताप महाविद्यालयात युवा संवाद मेळाव्यात ते दाखल झाले.




