
अमळनेर: नुकत्याच झालेल्या पावसाने तालुक्यातील ३५ गावांमधील १४ हजार ४८ शेतकऱ्यांच्या ९ हजार ६२५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
गेल्यावर्षी दुष्काळ आणि यावर्षी अतिपावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. २५ व २६ सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसाने शेतात पाणीच पाणी झाले होते. नद्या नाले वाहू लागले आहेत. काही ठिकाणी जमिनीत पाणी जिरत नसल्याने विहिरी जमीन पातळीपर्यंत भरलेल्या आहेत. आधी लावलेला मका काढणीला आलेला असल्याने शेतकऱ्यांनी तो काढून शेतातच ठेवला होता. पावसामुळे काढलेला मका चिखलात गेला. कापूस लागवड केलेल्या ७ हजार १३९ हेक्टर , मका १ हजार ७५९ हेक्टर , ज्वारी २४८ हेक्टर , बाजरी २५७ हेक्टर , उडीद ४९ हेक्टर , तूर ४८ हेक्टर , सोयाबीन ७३ हेक्टर , इतर ५२ हेक्टर असे एकूण ९ हजार ६२५ हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाले आहे. तालुका कृषी अधिकारी सी जे ठाकरे यांनी नुकसानीचा आढावा घेऊन वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे.

