
अमळनेर – तालुक्यातील जवखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी जयश्री कैलास माळी यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. जयश्री माळी यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याने ७० वर्षात जवखेडा माळी समाजाला सरपंच पदाचा बहुमान प्राप्त झाला असून जवखेडावासियांनी आनंद व्यक्त करत जयश्री माळी यांचा सत्कार केला.

जवखेडा ग्राम पंचायतीच्या सरपंच चारुशीला दिनेश पाटील यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी सोमवारी ग्रामपंचायत जवखेडा कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी जयश्री माळी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पी.एस.पाटील यांनी जयश्री माळी यांची बिनविरोध निवड जाहीर केली. तसेच उपसरपंचपदी दिनकर केशव पाटील यांचीही निवड करण्यात आली. यावेळी आजी माजी सरपंच,उपसरपंच,सदस्य, ग्रामसेवक रावसाहेब न्याहदे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच जयश्री कैलास माळी यांनी दिली आहे.




