
अमळनेर:- खानदेश तसेच प्रामुख्याने जळगाव जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प असून मेगा रिचार्ज च्या बाबतीत तापी खोरे विकसित करण्यावर यात भर दिला गेला आहे.मागील वर्षी २५० कोटी तर यावर्षी पुन्हा १०० कोटी रुपये पाडळसरे प्रकल्पासाठी मिळाले आहेत.
शेतकरी,महिला,युवक यांच्या सर्वांगीण विकासाचा समतोल साधणारा हा अर्थसंकल्प असून सिंचनाच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होऊ शकतो.

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणावर भर देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला यातून बळकटी मिळणार आहे.
पायाभूत सुविधांच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे तयार होणार आहे.ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून भविष्याच्या दृष्टीने शेतकरी स्वावलंबी होणार आहे.अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नव्या महाराष्ट्राची वाटचाल सुरू असून सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत आमदार अनिल भाईदास पाटील मा.मंत्री (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन) यांनी व्यक्त केले आहे.
समितीला राज्य शासनाकडून अजूनही मोठ्या निधीची अपेक्षा
पाडळसरे धरणासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात झाल्याने आनंद असला तरी सदर धरणाचा समावेश प्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेत अजूनही झालेला नसल्याने राज्य शासनाकडून अजूनही मोठ्या निधीची अपेक्षा समितीला आहे.
सध्या प्राप्त झालेला निधी व याआधी प्राप्त निधी एकत्रितपणे जून पर्यंत खर्च व्हावा तसेच धरणाच्या प्राप्त निधीतुन कोणतीही रक्कम पळवली जाऊ नये अशी अपेक्षा असून याबाबत पाडळसरे धरन जनआंदोलन समिती लक्ष ठेवून असेल असे पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे प्रवर्तक सुभाष चौधरी यांनी सांगितले.




