
अमळनेर : तालुक्यातील मारवड येथे डांगरी रस्त्याला असलेल्या खळवाडीस अचानक आग लागल्याची घटना ११ रोजी दुपारी तीन साडे तीन वाजेच्या सुमारास घडली.
अचानक लागलेल्या आगीत पाच ते सहा शेतकऱ्यांच्या खळ्यातील शेती साहित्य, एकाचे ट्रॅक्टर , चारा , लाकडी अवजारे आदि साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
अग्निशमन दलाचा सिंहाचा वाटा…
आगीचे वृत्त कळताच पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी दोन अग्निशमन बंब पाठवले तसेच चोपडा एरंडोल आणि धरणगाव येथील बंब देखील मागवले. अग्निशमन दलाचे कर्मचारी गणेश गोसावी ,दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख , जफर पठाण , मच्छीन्द्र चौधरी , आनंद झिम्बल , आकाश बाविस्कर ,भिका संदानशीव यांनी आग विझवली. सुदैवाने शेतकऱ्यांनी आपापली जनावरे तेथून काढून घेतल्याने गुरांचे नुकसान झाले नाही.
मदतीसाठी तरुणाई सरसावली
आगीचे वृत्त समजताच गावातील नळांना पाणी सोडण्यात आले. गावातील तरुण धावत आले आणि कोणी पाणी टाकत होते ,कोणी चारा मोकळा करून पाणी मारत होते ,कोणी पावडीने चारा आवरत होते , बादल्या भरून भरून आग विझवण्यासाठी धावत होते. अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वी तरुणाईने केलेले धाडस आणि तत्परता कौतुकास्पद होती.
घटनेचे वृत्त कळताच उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे , एपीआय जीभाऊ पाटील , मारवड पोलीस , तलाठी महेंद्र भावसार , मंडळाधिकारी , गावकऱ्यांसह डॉ. विलास पाटील, उमाकांत साळुंखे, योगेश साळुंखे यांच्यासह तरुणाईचे सहकार्य लाभले. सुमारे सात शेतकऱ्यांचे खळे व शेती साहित्य जळून पूर्ण खाक झाले.