
आ.अनिल पाटलांनी केल्या मुख्याधिकारीना सूचना, लवकरच घेणार पाणीपुरवठा वितरणाचा आढावा
अमळनेर :-शहरातील पाणीपुरवठा वितरण काही प्रमाणात विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होत असल्याने तातडीने याचे योग्य नियोजन करून पाणीपुरवठा नियमित करा याबाबत सक्त सूचना आ.अनिल पाटील यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना केल्या आहेत.
लवकरच केलेल्या नियोजनाचा आणि पाणीपुरवठा विभागाचा आढावा आपण स्वतः घेणार असल्याचेही आमदार अनिल पाटील यांनी म्हटले आहे.दरम्यान शहरात सध्या नागरिकांना पाच ते सहा दिवसांनंतर पाणी मिळते आणि त्यातही अनेकदा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे.विशेष म्हणजे पाणी वितरण कंत्राटी पद्धतीने केले जात आहे. त्यात नियोजनाचा अभाव असल्याची ओरड नागरिकांत होत आहे.तापीत पाणी उपलब्ध असूनही कृत्रिम पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असल्याने नागरिकांची नाराजी होत आहे.सध्या लग्न सराई सुरू असल्याने घरोघरी पाहुणे मंडळी आलेली आहे,तसेच आगामी काळात अमळनेरचा मोठा यात्रोत्सव देखील आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन तातडीने सुधरविणे गरजेचे आहे.विशेष करून तांबेपूरा,पैलाड,शिरूड नाका,मुंदडा नगर यासह इतर कॉलनी भागात पाणीपुरवठा विस्कळित होण्याचे प्रमाण वाढल्याने आलेल्या तक्रारी नुसार आ.अनिल पाटील यांनी तातडीने याची दखल घेत स्वतः लक्ष घातले असून कोणत्याही परिस्थितीत नियोजनात सुधारणा करून नागरिकांचे हाल थांबवा अशा सूचना त्यांनी पालिका प्रशासनास दिल्या आहेत.