
नागरिकांचा संताप, नगरपालिकेने पाणीपुरवठा थांबवून दोष शोधणे केले सुरू
अमळनेर : शहरात आधीच तापाच्या व्हायरल आजाराने शेकडो रुग्ण असतांना अमलेश्वर नगर भागात गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे नगरपालिकेने त्या भागातील पाणीपुरवठा थांबवून दोष शोधणे सुरू केले आहे.

अमलेश्वर नगर भागात नागरिकांच्या नळाला १६ रोजी पाणी आले तेव्हा पाणी अतिशय गढूळ होते. आणि त्याची दुर्गंधी देखील येत होती. तेथील नागरिकांनी संताप व्यक्त करत तातडीने नगरपालिकेला पाणीपुरवठा बंद करायला सांगितले.
आधीच शहरात व्हायरल विषाणुने नागरिक त्रस्त झाले आहेत. कोरोना प्रमाणे नागरिकाना ताप , अंगदुखी ,अस्वस्थ वाटणे ,दमा , घसा दुखणे ,सर्दी आदि प्रकारच्या लक्षणांनी त्रासले आहे. किमान पाच सहा दिवस तरी नागरिकांना त्रास होत आहे. त्याचप्रमाणे घरात देखील एकाला लागण झाल्यास कुटुंबातील सर्वांना त्रास होत आहे. शहर या संकटातून बाहेर पडत नाही तोच ऐन पावसाळ्यात अमलेश्वर नगर भागात गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. कुणाचा तरी शोषखड्डा असेल त्याठिकाणी पाइपलाइन फुटली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रतिक्रिया…
दोन तीन ठिकाणी पाईप खोदून तपासणी करण्याचे काम सुरू केले आहे. दोन्ही बाजूकडून पाणी टाकून नेमका दोष कोठे आहे हे शोधणे सुरू आहे.- प्रविणकुमार बैसाणे, अभियंता पाणीपूरवठा विभाग, अमळनेर नगरपालिका
गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिकाना कावीळ , अतिसार , संडास ,उलट्या ,टायफाईड असे जलजन्य आजार होऊ शकतात. नागरिकांनी पाणी उकळून आणि गरम करून प्यावे. नळातून आधी आलेले पाणी पिण्यासाठी भरू नये.- डॉ विलास महाजन, वैद्यकीय अधिकारी,नगरपालिका अमळनेर
व्हायरल आजारासाठी नागरिकांनी क जीवनसत्व, सकस आहाराचा वापर करावा , आराम जास्त करावा तसेच कोरोना प्रमाणे काळजी घ्यावी, आजारी व्यक्तींपासून लांब रहावे – डॉ गिरीश गोसावी,तालुका वैद्यकीय अधिकारी अमळनेर




