
अमळनेर:- तालुक्यातील नगाव खूर्द, नगाव बुद्रुक तसेच गढखांब व पंचक्रोशी परिसरातील इतर भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकं तसेच काढणीस आलेले कापूस आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग अक्षरशः हवालदिल झाला आहे.
एकीकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पिकांना अत्यंत कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी आधीच चिंतेत होता. त्यात या अवकाळी पावसाने त्यांच्या अर्थकारणावर मोठा आघात करून चिंता आणखी वाढवल्या आहेत. कापूस व मक्का पिकाचे भरपूर नुकसान झाले असून, ऐन काढणीच्या वेळेसच शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हरवला, अशी स्थिती झाली आहे.
या संकटग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने मदतीची घोषणा करावी, अशी मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे तालुकाध्यक्ष मयूर अनिल बोरसे व विपुल किरणगीर गोसावी यांनी शेतकरी बांधवांच्या वतीने प्रशासन आणि जनप्रतिनिधींना तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
“अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, तसेच मागील रखडलेली भरपाई तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच त्यांनी अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांना विनंती केली आहे की, त्यांनी या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन प्रशासनाला त्वरीत पंचनाम्याचे आदेश द्यावेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.
मयूर बोरसे व विपुल गोसावी यांनी पुढे सांगितले की,
“शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ कागदोपत्री पाहण्याऐवजी, प्रशासनाने प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीचे योग्य मूल्यमापन करावे व लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी.”
तसेच त्यांनी नमूद केले की, महायुती सरकारच्या जीआरनुसार अमळनेर तालुक्यालाही तत्काळ मदत मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.




