
अमळनेर -शहरातील भगिनी मंडळाची आदर्श प्राथमिक शाळेत मंगळवार रोजी सकाळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालआनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा सरोजताई भांडारकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी उपाध्यक्षा मंगला पाटील, सेक्रेटरी अनुरूपा भांडारकर,रजनीताई केले, लीलाताई राणे, विद्या कोल्हे, अलका पाटील, स्मिता शुक्ल यांची प्रमुख उपस्थिती होती.
बालआनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः घरून तयार केलेले खमंग व रुचकर इडली, खमंग, रगडा भेळ ,चॉकलेट मोदक, गुलाबजाम, आप्पे, चना चटपटे, गोड बोरे, मेथीचे वडे,साबुदाणा वडे चोलापल्ली, वडापाव,पोंगे बटाटे, मोमोस, पाणीपुरी, ज्वारीचे शंकरपाळे तसेच विविध प्रकारचे उसळी, मिसळ पाव, इत्यादी पदार्थ विक्रीसाठी मांडले होते. सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः पैशांची देवाण-घेवाण करून पदार्थ विकत घेत व खाऊन आनंद व्यक्त करत होते. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे. या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका मंगला सोनवणे, उपमुख्याध्यापिका विजया गायकवाड, बालक मंदिर मुख्याध्यापिका सिमा शेवाळे यांच्यासह सकाळ विभागाच्या सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.




