
अमळनेर :-भगवान महावीर स्वामी जयंतीनिमित्त काल मंगळवार (ता. ३१) रोजी शहरात आयोजित भव्य शाही वरघोडा मिरवणूक मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात पार पडली.तर सायंकाळी भगवान महावीर पुजन व भजन संध्या कार्यक्रम पार पडला.

सकाळी ७.३० वाजता श्री गिरुवाजी पार्श्वनाथ जैन मंदिरातून मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत हा वरघोडा ब्रम्हे गल्ली, कुंटे रोड, दगडी दरवाजा, मुंबई गल्ली, जैन स्थानक, सुभाष चौक, स्टेशन रोड, तेरापंथ भवन, आयडीबीआय बँक, दादावाडी, नर्मदावाडी, शीतलनाथ मंदिर मार्गे इंदिरा गांधी भवन येथे समारोपास पोहोचला.वाटेत माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांचेसह इतर मान्यवरांनी हजेरी लावून समाजबांधवाना शुभेच्छा दिल्या.वरघोड्यात पंचकल्याणक रथ हे प्रमुख आकर्षण ठरले. त्यासोबतच शहनाई वादन, आदिवासी ढोल पथक, भजनी मंडळ तसेच लेझीम पथकाच्या तालावर वातावरण भक्तिमय झाले होते. विविध आकर्षक झांक्यांमधून भगवान महावीर स्वामी यांच्या जीवनातील प्रसंग साकारण्यात आले होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांनी मोठ्या उत्साहात जयघोष करत वातावरण दुमदुमून टाकले.
यावेळी पुरुषांनी पारंपरिक पांढरे वस्त्र परिधान केले होते, तर महिलांनी लाल चुंदरी साड्यांमध्ये सहभागी होत मिरवणुकीला विशेष आकर्षण प्राप्त झाले.शिस्तबद्ध आणि संयमी पद्धतीने मिरवणूक पार पडावी यासाठी वरघोड्यात सेल्फी घेण्यास मनाई करण्यात आली होती.
दरम्यान, भगवान महावीर स्वामी यांच्या जीवनावर आधारित पोस्टर स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेतून महावीरांच्या विचारांचे प्रभावी चित्रण सादर केले.यावेळी बंदोबस्तसाठी स्वतः पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम तसेच सिद्धांत शिसोदे व पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते.
दुपारी इंदिरा भुवन येथे नवकारशी तर सायंकाळी शितलनाथ मंदिरात भगवान महावीर पूजन करण्यात आले.यावेळी मंदिरात विद्युत रोषणाई, फुले व दिव्यांनी मनमोहक सजावट करण्यात आली होती.यानंतर मुंबई येथील गायक अनिश राठोड यांच्या ग्रुपने भजन संध्या कार्यक्रम सादर करून रंगत आणली.
या भव्य सोहळ्याचे आयोजन भारतीय जैन संघटना तसेच महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले होते.यासाठी
महावीर जन्मकल्यानक समितीचे अध्यक्ष राजेश बेदमुथा,भरत कोठारी,ऋषभ पारेख,सचिन चोपडा,रोहित सिंघवी,कुमारपाल कोठारी,अनिल कोठारी,प्रतिक जैन,दिनेश लोढा,शितल कोठारी,संजय गोलेच्छा,डॉ किशोर शाह, महेंद्रलाल कोठारी, प्रकाशचंद पारेख, डॉ रविंद्र जैन,महावीर सिंघवी,प्रतीक शाह, जितेंद्र कटारिया,खेमचंद,भावेश धाडीवाल,राज जैन,सौरभ छाजेड,दिनेश लोढा,महावीर पहाडे,सनी कोठारी, दिनेश कोठारी,विकास कोठारी, गिरीश कोठारी तसेच संकल जैन संघाचे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.
शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.




