
आमदार अनिल पाटील यांचे तहसीलदारांना आदेश, कृषी मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा
अमळनेर:- तालुक्यात गेल्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अश्या सूचना वजा आदेश माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

यासंदर्भात आमदारांनी राज्याचे कृषी मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी देखील भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून शेतकऱ्यांची व्यथा मांडली.तालुक्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाचा कहर पहायला मिळाला असून २ रोजी सायंकाळी झालेल्या पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे शेतकरीराजा हवालदिल झाला आहे.अमळनेर तालुक्यातील मारवड सह तासखेडा, आमोदे, अंतुर्ली, रंजाणे आदी बोरी काठावरील गावे, चिमनपुरी पिंपळे खु, पिंपळे बु, अटाळे ,शिरसाळे, आर्डी, अनोरे, जवखेडा यासह नीम, पाडळसरे, कळमसरे, बोहरा, मांडळ,वावडे यासह तालुक्यात सर्वदूर जोरदार वादळ आणि वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा मका, बाजरी, ज्वारी,दादर,गहू व इतर पिके आडवी पडली आहेत.अनेक शेतकऱ्यांनी मका,गहू व इतर काढणीवर आलेली पिके कापून ठेवलेली असल्याने ती पिकेही पाण्याखाली आल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती आमदारांनी कृषिमत्र्यांना देऊन सदर पीडित पीडित शेतकरी बांधवाना शासनाने मदत घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.




