
धनगर बांधवांनी स्वतःवर आसूड ओढवून घेत प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन…
अमळनेर:- धनगरांना एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी अमळनेर येथील महाराणा प्रताप चौकात धनगर बांधवांनी स्वतःवर आसूड ओढवून अनोखे आंदोलन केले व त्यांनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

दिनांक २२ रोजी सकाळी १० वाजता अमळनेर तालुक्यातील धनगर बांधव संघटित होऊन शासनाच्या विरोधात त्यांनी महाराणा प्रताप चौकात आसूड आंदोलन केले. तेथून मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे वळला. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाने न्यायालयात धनगड समाज अस्तित्वात नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. जो समाज अस्तित्वात नाही त्या समाजला आरक्षण कसे दिले ? असा सवाल करत धनगड आणि धनगर एकच समजून आरक्षण देण्यात यावे. २०१४ मध्ये आत्मक्लेश आंदोलन करून देखील ९ वर्षात शासनाने दखल घेतली नाही म्हणून शासनाला जाग येण्यासाठी आसूड आंदोलन करण्यात आले. विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळणाऱ्याला मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी ,चौंडी अहमदनगर येथील १७ दिवसांपासून उपोषणास बसलेल्या मल्हार सैनिकांशी चर्चा करावी असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी मच्छिंद्र लांडगे, डी ए धनगर, नितीन निळे, हरचंद लांडगे, समाधान धनगर, दशरथ लांडगे, बन्सीलाल भागवत, एस सी तेले, जीभाऊ कंखरे, ए बी धनगर यांच्यासह अनेक धनगर बांधव हजर होते.




