
खंडित परंपरा पुन्हा सुरू, मंडळांनी आदर्श मिरवणूक काढून व्हावे सन्मानाचे मानकरी…
अमळनेर:- शहरात आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने शांततेत मिरवणूक काढणाऱ्या आदर्श मंडळांचा श्री सन्मान करण्यात येणार असून यानिमित्ताने अमळनेरची मंडळाचे स्वागत करण्याची खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू होणार आहे.

सर्व गणेश मंडळांनी मात्र आदर्श मिरवणूक काढून या सन्मानाचे मानकरी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना,मुंदडा फाऊंडेशन, पोलीस स्टेशन अमळनेर व नगरपरिषद अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान करण्यात येणार आहे.अमळनेर म्हणजे सण उत्सवांचा आदर करणारी भूमी आहे,काही वर्षांपूर्वी येथील सुभाष चौकात गणेश विसर्जन मिरवणुकांचे सहर्ष स्वागत होत असे यामुळे वेगळाच उत्साह विसर्जन मिरवणुकीत निर्माण होत होता, काळाच्या ओघात ती परंपरा खंडित झाली होती,आता तीच खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला असून यासाठी अट एकच आहे की, सदर मंडळ आदर्श असावे,आदर्श म्हणजे विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात मात्र कोणताही वादविवाद किंवा गोंधळ न घालता, शिस्तबद्ध, पर्यावरण पूरक आणि वेळेच्या आत काढून या पूरस्काराचे मानकरी व्हायचे आहे. सदर सन्मान दगडी दरवाजा समोर निर्माण करण्यात आलेल्या भव्य मंचावरून होणार असून येथे सन्माननीय सर्व लोकप्रतिनिधी आणि सन्माननीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या शुभहस्ते आदर्श मंडळ म्हणून श्री सन्मान पुरस्कार म्हणून ट्रॉफी बहाल करण्यात येणार आहे. याचवेळी गणेश विसर्जनासाठी परिश्रम घेणारे, पोलीस,महसूल आणि पालिका क्षेत्रातील अधिकारी तसेच जातीय सलोखा राखण्यासाठी सहकार्य करणारे मुस्लिम बांधव यांचाही लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते आदर्श अधिकारी म्हणून श्री सन्मान करण्यात येणार आहे.सत्काराची वेळ सायंकाळी 6 ते रात्री 12 असणार आहे.तसेच सातव्या व नवव्या दिवशी शांततेत मिरवणूक काढणाऱ्या मंडळाचा देखील यावेळी श्री सन्मान करण्यात येणार आहे.
तरी सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शांततेत मिरवणूक काढून आपल्या भूमीत सलोख्याचे वातावरण कायम ठेवावे व श्री सन्मानाचे मानकरी व्हावे असे आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना, मुंदडा बिल्डर्स अमळनेर, अमळनेर पोलीस स्टेशन व अमळनेर नगरपरिषद यांनी केले आहे.




