
मनोज जरांगे पाटील यांनी अमळनेर येथील सभेत केले आवाहन…
अमळनेर:- आरक्षण असलेल्या विदर्भ आणि खान्देशातील कुणबी ओबीसी बांधवांना विनंती आहे, मराठ्यांना तुमच्या पाठबळाची गरज आहे. तुम्हाला आरक्षण आहे म्हणून थंड बसू नका मराठ्यांचे लेकरू वेदनेने त्रासतेय. आपले रक्त एक आहे आपली पोरे आणि आपली जात जगली पाहिजे यासाठी एकजूट ठेवा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी अमळनेर येथील सानेगुरुजी विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत केले. सकल मराठा समाजातर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते.
जरांगे पाटील पुढे म्हणाले की राजकीय स्वार्थापोटी एक नेता जातीय भांडणे लावण्याचे काम करीत आहे. आमच्या मनात पाप राहिले असते तर काहीच्या काही झाले असते. येवल्याचा हा पहिला मंत्री आहे जो महापुरुषाची जात काढतो. मी तुमच्या बळावर लढतो त्याला पाहण्यासाठी मी खंबीर आहे. महाराष्ट्रातील मराठा ही एकमेव जात आहे की जी आरक्षणाची अट पूर्ण करते बाकी कोणतीही ओबीसी असलेल्या जातीकडे त्या अटींची पूर्तता होत नाही. मराठ्यांना ७० वर्षापासून आरक्षण का दिले नाही याचे उत्तर शासनाकडे नाही. सरकारला माझी भाषा कळत नाही. मला गोर गरिबांच्या वेदना कळतात मी त्याच मांडतो, माझे आणि पद, पैसे, इंग्रजीचे जमत नाही, आपल्या वाटेला आलेलं कष्ट आपल्या मुलांना यायला नको म्हणून आरक्षण पाहिजे. माझ्या मराठ्यांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद पाहिजे. मला समाजाशी गद्दारी करायची नाही. माझ्या समाजाला संपवण्यासाठी षडयंत्र रचले आहे मात्र मराठ्यांचे स्वप्न आहे काहीही झाले तरी आरक्षण मिळवायचे आहे. जळगाव जिल्ह्यात साडे तीन लाख नोंदी मिळाल्या. महाराष्ट्रात ३२ लाख नोंदी सापडल्या. एका नोंदीवर २०० प्रमाणे २ कोटी मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. २४ डिसेम्बर पर्यंत सरकारने वेळ दिलाय. मला डॉक्टरांनी दोन महिने आराम करायला सांगितला आहे. पण मेलो तरी चालेल मराठ्यांना आरक्षण घेणारच, फक्त शांततेने आंदोलन करा असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.
साडे चार वाजता जरांगे पाटील यांचे अमळनेरात आगमन झाले. जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. मोहिनी बँडने त्यांचे स्वागत केले. मंत्री अनिल पाटील यांच्या वहिनी राजश्री पाटील यांनी अण्णाभाऊ साठे चौकात औक्षण केले. सभेच्या ठिकाणी महिलांनी औक्षण करून समाजाच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार केला. सभेला माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ बी एस पाटील, मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील, विक्रांत पाटील, संजय पाटील, बाबु साळुंखे, सचिन वाघ, जयवंत पाटील, प्रवीण देशमुख,हर्षल जाधव,राजेंद्र देशमुख, भूषण भदाणे, मनोहर निकम, प्रशांत निकम, लीलाधर पाटील,श्याम पाटील, अविनाश पाटील, संदीप घोरपडे, जयेश पाटील,सनी पाटील,हर्षल पाटील, राजश्री पाटील, स्वप्ना पाटील, धनगर पाटील, तिलोत्तमा पाटील, सुनीता पाटील, प्रतिभा जाधव, शुभांगी देशमुख,सोनाली निकम, कविता पवार, रिता बाविस्कर, माधुरी पाटील,गौरव पाटील, ऍड दिनेश पाटील , हेमकांत पाटील, विलास पाटील ,गोकुळ सोनखेडीकर, प्रफुल्ल बोरसे,पी जी पाटील, दौलत पाटील,शैलेश पाटील, कैलास पाटील यांच्यासह सुमारे सात ते आठ हजार कुणबी मराठा समाजाचे लोक हजर होते. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.




