
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात “राष्ट्रीय सेवा योजना” व “विद्यार्थी विकास विभागाच्या” संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय महाजन तर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी व रासेयो. कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नाजमीन पठाण हिने केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते “राजमाता जिजाऊ” व “स्वामी विवेकानंद” यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी केले. उपस्थितांच्या सत्कार समारंभानंतर, उपस्थित विद्यार्थ्यांमधुन कु. कोमल पाटील व प्रतापसिंग भिल यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांची शिकवण अंगी काढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तर कुमारी वैष्णवी महाजन व आकाश पाटोळे यांनी राजमाता जिजाऊंनी छ. शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार व त्यातून मिळालेले स्वराज्य याविषयी सविस्तर वर्णन करून राजमाता जिजाऊंचे संस्कार आज तरुणांनी अंगीकृत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. संजय महाजन यांनी सत्यस्थितीतील युवकांपुढील आदर्श, आव्हाने आणि संधी यावर विवेचन करीत, दोन्ही महान विभूत्यांचे संस्कार व शिकवण अंगीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करून युवकांनी भारताला सक्षम व शक्तिशाली करून जगात पुढे नेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी केले, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.




