
अमळनेर:- अमळनेर नगरीतील संत सखाराम महाराज संस्थानचा रथोत्सव आज दि.१९ मे रोजी रात्री एकादशीला पार पडणार असून रथोत्सवाची यंदा जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून अमळनेरच्या रथोत्सवाची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे.सायंकाळी ६ वा. वाडी संस्थान मधून रथोत्सवास सुरुवात होते.रथामध्ये श्री लालजींची मूर्ती ठेवली जात असते. वाडी चौक,सराफ्फ बाजार, दगडी दरवाजा,फरशी पूल पैलाड मार्गे हा रथ दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेला वाडी संस्थानात दाखल होत असतो. रथाच्या मागे प.पू.प्रसाद महाराज अनवाणी पायी चालत असतात. रथोत्सव पाहण्यासाठी महिला व पुरुष बांधवांची मोठ्या प्रमाणात संपूर्ण खानदेशातून शहरात गर्दी होत असते. शुभारंभ प्रसंगी सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक आवर्जून उपस्थित राहत असतात. प्रत्येक समाज या रथोत्सवाची जबाबदारी सांभाळत असतो. रथोत्सवाचा सोहळा पार पाडण्यासाठी गावातील प्रत्येक समाजावर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात येत असते.




