
रस्त्यात गावांना भेटी देत मान्यवरांशी संवाद साधून राबवतात अक्षर आनंद वाचन चळवळ…
अमळनेर:- मोबाईलच्या दुनियेत मुले वाचन संस्कृती विसरत चालले असताना मात्र परभणी येथील जिल्हा परिषदेचा शिक्षक महाराष्ट्रभर रखरखत्या उन्हात सायकलवर प्रवास करून वाचन जनजागृती करत आहेत. शाळेचा कालावधी व्यतिरिक्त सुट्यांमध्ये त्यांची धडपड वाखाणण्याजोगी आहे.

सध्या मुले मोबाईल किंवा संगणकावर गुगलच्या माध्यमातून उत्तरे शोधत असल्याने पुस्तके वाचणे विसरत चालले आहेत. म्हणून परभणी येथील विनोद बबनराव शेंडगे हे परभणी येथे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत. दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळ्याची सुटी वाया न घालवता ते सायकलवर प्रवास करून रस्त्यातील ग्रंथालय, शिक्षक, पत्रकार, साहित्यिक, वाचक यांच्याशी संवाद साधून अक्षर आनंद वाचन चळवळ राबवत आहेत. यात पाच कृती कार्यक्रम राबवतात. यात सहकुटुंब वाचन करूया, वाचनासाठी निमित्त शोधुया, पुस्तक वाचन स्पर्धा, वाचन संस्कार केंद्र, मी वाचलेली पुस्तके यावर बोलूया या कृती राबवून वाचन संस्कृती वाढवण्यासाठी त्यांची तळमळ सुरू आहे.
३ जून पासून ते कडक उन्हात सायकलवर परभणी ते नंदुरबार दौऱ्यावर निघाले आहेत. दररोज ९० ते १०० किमी प्रवास करतात. परभणी ,मंठा , बुलढाणा , मलकापूर , जळगाव मार्गे ते अमळनेर पोहचले आहेत. अमळनेर येथे सानेगुरुजी वाचनालय, तत्वज्ञान केंद्र, सानेगुरुजी स्मारक, दर्शना पवार यांच्या माइण्ड पार्लरला भेटी दिल्या.
दररोज चार ते पाच ठिकाणी थांबून ते प्रचार करतात. सकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत प्रवास करतात. दुपारी ३ नंतर पुन्हा प्रवासाला निघतात. एखादा शिक्षक किंवा वाचनालयात ते मुक्कामी थांबतात. ७ जून ते ३१ डिसेंबर दरम्यान त्यांनी सहकुटुंब वाचन स्पर्धा, रोज मोठ्यांसाठी १० पाने आणि बालकांसाठी ५ पाने वाचन आणि वाचलेल्या भागावर पाच ओळी सारांश लिहायची स्पर्धा आयोजित केली आहे. नंतर या नोंदी वह्या जमा करून उत्कृष्ट वाचकाचा गौरव करण्यात येणार आहे. शाळेत विद्यार्थ्यांना शिकवून सुट्यांमध्ये महाराष्ट्रभर जनजागृती करणाऱ्या विनोद शेंडगे या शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.




