
नरेंद्र चौधरी यांची मागणी, भुयारी गटारीसाठी महिन्याभरापासून बंद आहे रस्ता…
अमळनेर:- राम मंदिरापासून तांबेपूरा भागाकडे जाणारा रस्ता भूमिगत गटारीच्या कामासाठी महिन्याभरापासून बंद असल्याने बंगाली फाईल व तांबेपुरा या भागातील लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.सदर रस्ता तातडीने सुरू करावा अशी मागणी माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी केली आहे.

चारचाकी तर बंद आहेच परंतु नागरिकांना येथून मोटर सायकलने जाणे सुद्धा शक्य होत नसून आता शाळा कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. येथे अपघात होण्याचीही भीती असून बोरी काठच्या सर्व गावापर्यंत जाण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांसाठी हा एकच रोड असताना तो देखील बंद असल्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. सध्या शेतीची कामे सुरू आहेत,व प्रभाग एकच्या परिसरात अनेक शेत मजूर व शेतकरी बांधवाचा देखील रहिवास असल्याने त्यांचेही हाल होत आहेत.
विप्रोत येणारी वाहनेही जाताहेत परतून…
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमळनेर शहरामध्ये एकमेव विप्रो ची एकमेव साबण फॅक्टरी आहे त्या साबण फॅक्टरी मुळे हजार लोकांना रोजगार उपलब्ध झालेले आहे,या फॅक्टरीत जाण्यासाठी हा एकमेव रोड आहे फॅक्टरीमध्ये लोडिंग करण्यासाठी व अनलोनिंग करण्यासाठी शेकडो ट्रक येत असतात त्यांना सुद्धा फार मोठी गैरसोय निर्माण झाली असून आलेली वाहने अक्षरशः परतून जात आहेत.
तरी सदरचा रस्ता तातडीने चालू करावा या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी व त्या भागातील नागरिकांनी मुख्याधिकारीना यांना दिले असून तातडीने दखल न घेतल्यास आंदोलनाच्या इशारा त्यांनी दिला आहे.

