
समस्या कायमस्वरूपी सोडवण्याची ग्रामस्थांनी केली मागणी…
अमळनेर:- तालुक्यातील भरवस येथील रेल्वे बोगद्यात पाणी साचत असल्याने प्रवाश्यांना तसेच वाहनांना त्रास होत असून किरकोळ अपघात होत आहेत. या बोगद्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात यावी अशी मागणी भरवस व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

अमळनेर ते शिंदखेडा जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. पाडसे मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर खूप वळणे आहेत व रेल्वे गेट वारंवार बंद येत असल्याने प्रवाशी, दुचाकीस्वार भरवस मार्गे जातात. पावसाळ्यात भरवस बोगद्यात पाणी साचत असल्याने तेथे चिखल होतो. खाली खड्डे असल्याने चिखलात दिसत नाहीत. परिणामी वाहने खड्डयात पडून नुकसान होते.तसेच मोटरसायकलवर बसलेले प्रवाशी तोल गेल्याने खाली पडतात. त्यांच्या हातापायाला दुखापत होते. कपडे चिखलाचे भरतात. अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. प्रवाश्यांच्या वाहनांचे नुकसान आणि दुखापती टाळण्यासाठी नवनियुक्त खासदार यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून बोगदा दुरुस्त करून त्यातील पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी अशी मागणी भरवस ग्रामस्थ आणि परिसरातील प्रवाश्यांकडून करण्यात आली आहे.




