
अमळनेर : प्रशासनाच्या सतर्कतेने बालविवाह रोखण्यात आला असून अल्पवयीन मुलीच्या पालकांना पोलिसांनी सक्त ताकीद देऊन सोडले आहे. मुलीला बालसुधार गृहात रवाना करण्यात येणार असल्याचे समजते.

अमळनेर येथील बोरसे गल्लीतील एका १७ वर्षीय मुलीचा विवाह नाशिक येथील भावेश सुभाष पाटील याच्याशी होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे , पोलीस स्टेशन आणि आधार संस्थेला मिळाल्यावर नायब तहसीलदार प्रशांत धमके , सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे , एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील , संरक्षण अधिकारी योगिता चौधरी , ज्ञानेश्वरी पाटील यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली. विवाह रोखण्यात आला. मुलीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून तिचे वय कमी असल्याचे सिद्ध झाल्याने पोलीस स्टेशनला आणून त्यांचे जाबजबाब घेण्यात आले. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तीचे लग्न करू नये अशी ताकीद व लेखी समज पालकांना देण्यात आली.
प्रतिक्रिया
अल्पवयीन मुलगी, तिचे पालक यांना बाल कल्याण समितीपुढे हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.- रवींद्र पिंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक,अमळनेर





