
अमळनेर:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मराठी विभाग मारवड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात आज मोठ्या उत्साहात “मराठी भाषा गौरव दिवस” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, श्रेष्ठ कथाकर, कादंबरीकार, कवी, नाटककार आणि श्रेष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष कला वर्गातील विद्यार्थीनी पूनम भिल या विद्यार्थ्यांनीने केले, तर प्रास्ताविक प्रा. डॉ. एस. एस. पाटील यांनी केले. त्यात भाषा आपल्या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन आणि विकास करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन आहे. भाषा ही आत्मिय संवादाचं साधन तर आहेच, पण संस्कृतीचे, प्रकृत्तीचे प्रतिकही आहे. सभ्य संस्कृतीने प्रदान केलेले अंतःकरणातील भाव भाषेतून व्यक्त होतात. आम्ही भाग्यवान की आम्हांला मातृभाषा मराठी लाभलीय या विचारवर त्यांनी जोर दिला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. विश्वनाथ पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले पाहिजेत असे विचार त्यांनी व्यासपीठावरून व्यक्त केलेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. वसंत देसले सर हे उपस्थित होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगताद्वारे अनमोल असे मार्गदर्शन केले. त्यात ते म्हणालेत – ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ हा दिवस का साजरा केला जातो ? याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले – आज २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे थोर मराठी कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समिक्षक, विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्म झाला तो जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून हा दिवस सर्वत्र मोठ्या उत़साहात साजरा केला जातो असे त्यांनी विद्यार्था़ंना मार्गदर्शन केले. यावेळी नाजमिन पठाण, वैष्णवी मिल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी वाढवून, मराठी साहित्य व संस्कृतीची रूजवण करूया. मराठीच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहूया असा संकल्प सर्वानुमते करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आभार नेहा भोई हिने मानले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

