
शांतता कमिटीची बैठकीत पोलीस निरीक्षकांनी दिला इशारा,व्हाट्सएप एडमिंन व युजर्सनाही केले लक्ष्य
अमळनेर-“खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे”असा संदेश जगाला देणाऱ्या पूज्य सानेगुरुजींच्या अमळनेरात जातीय वाद व्हायलाच नको,याठिकाणी पोलीस प्रशासन पूर्ण तयारीनिशी असून असे संदेश व्हायरल करणारे मोबाईल युजर्स असतील किंवा एडमीन असतील कुणाचीही गय केली जाणार नाही,आम्ही शांतता अबाधित होऊ देणार नाही,यासाठी जनतेनेही सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक केदार बारबोले यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले.

हिंदू मुस्लिम बांधवांचे सण व कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी गांधलीपुरा पोलीस चौकीत शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी पत्रकार संजय पाटील,पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपुत,ऍड शकील काझी,उमेश धनराळे,इम्रान खाटीक, आरिफ भाया आदींनी मनोगत व्यक्त करून पोलीस प्रशासनाकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या.शेवटी मार्गदर्शन करताना पो नी बारबोले पुढे म्हणाले की दोन्ही बाजूला काही समाजकंटक असतांत त्यांना शांतता आवडत नाही, समाजकंटक असे प्रयत्न करत असतील तर करू द्या,मात्र आपण बळी पडू नका,दंगली मध्ये कुणाचाही फायदा होत नाही,याउलट समाजाचे नुकसान होते,प्रत्येक समाजात लहान मुले असतील त्यांची समजूत काढा,शहराचे जसे नाव होते तीच ओळख कायम राहू द्या,आम्ही बाहेरचे असताना जवाबदारी घेतो,तुम्ही तर याच गावाचे लोक असल्याने जवाबदारी घ्या,सर्व समाजाचे सण शांततेत होतील.काही अडचण असल्यास चर्चा करा,चर्चेतुन सर्व प्रश्न सुटतील अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली.
यावेळी सहा पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे , पीएसआय भगवान शिरसाठ यासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच माजी नगरसेवक नरेंद्र संदानशीव,मुक्तार खाटीक, सलीम टोपी, संजय पाटील , नरेश कांबळे , योगेंद्र बाविस्कर यासह आजी माजी नगरसेवक व हिंदू मुस्लिम समाजातील बांधव उपस्थित होते. आभार संजय पाटील यांनी मानले.

