
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथे शेतशिवारात अवघड मोडक्या विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाचे प्राण तेथील तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले.

तालुक्यातील मंगरूळ येथील कैलास देवचंद पाटील यांच्या विहिरीवर पाणी घ्यायला गेलेल्या कल्पेश पाटील याला २ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विहिरीत सात ते आठ महिने वयाचे हरणाचे पिल्लू पडलेले दिसले. हरीण जीव वाचवण्यासाठी पाण्यात धडपड करीत होते. सरपंच समाधान पारधी याना माहिती मिळताच तहसीलदार रुपेशकुमार सुराणा याना कळवण्यात आले. त्यांनी वनविभागाच्या पथकाला पाठवले. त्या दरम्यान मंगरूळ येथील स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी भूषण मधुकर भदाणे आणि धनंजय हिलाल पाटील या दोघांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उड्या मारल्या. विहिरीत खूप खोल पाणी होते आणि विहिरीचे कठडे पूर्णपणे तुटलेले होते. माती भुसभुशीत झाली होती. दोघा तरुणांनी हरणाला पकडले. तोपर्यंत सरपंच समाधान पारधी , दिनेश पाटील ,अशोक गोकुळ पाटील , शुभम धनगर , अनिल चव्हाण ,कल्पेश पाटील ,राजेंद्र पाटील ,विठ्ठल पाटील यांनी तीन दोर विहिरीत सोडले. हरणाला एका दोराने बांधून वर काढण्यात आले. व इतर दोन दोरांच्या साहाय्याने विहिरीतील दोघांना बाहेर काढले. हरीण वरून खाली पडल्याने आणि धडपड केल्याने त्याला किरकोळ जखमा झाल्या होत्या. वनरक्षक पी जे सोनवणे ,रामदास वेलसे ,वनमजुर मयूर पाटील , समाधान पाटील यांनी हरणाला ताबडतोब पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. डॉ संदेश वाटोळे यांनी किरकोळ जखमांवर उपचार केले. तद्नंतर हरणाला जंगलात सोडण्यात आले.
मंगरुळच्या तरुणांनी जीवाची पर्वा न करता मोडक्या खोल विहिरीत उड्या मारून हरणाचे प्राण वाचवल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी अशोक सूर्यवंशी ,संजय पाटील ,खुशाल पाटील हजर होते.
त्याचप्रमाणे तालुक्यातील आमोदा येथे देखील गावापासून तीन किमी अंतरावर मच्छीन्द्र ताथुराम पाटील यांच्या शेतातील विहिरीत देखील दोन ते तीन महिन्यांचे हरणाचे पिल्लू पडल्याची माहिती पोलीस पाटील यांनी वनविभागाला कळवली होती. मात्र आमोदा येथे पडलेल्या हरणाचा पाण्यातच मृत्यू झाला होता. दोन तीन दिवस आधी ते पडलेले होते. पाण्यात धडपड करून थकल्याने त्याचा मृत्यू झाला होता. कडक उन्हाळा लागल्याने पाण्याच्या शोधत हरीण आले असावेत आणि पाण्यात पडले असावेत.
शेतकऱ्यांनी जंगली प्राण्यांसाठी शेतात पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी. तसेच विहिरींना कठडे अथवा झाकण लावावे.- पी जे सोनवणे वनरक्षक , अमळनेर

