
ऐन यात्रोत्सवाच्या तोंडावर संस्थानने घेतला एकतर्फी निर्णय…
अमळनेर:- भक्तांच्या सुरक्षेचे कारण दाखवून सखाराम महाराज मंदिर संस्थानाने यंदा यात्रेतील रथ ट्रॅक्टरने ओढणार असल्याचे ऐन यात्रोत्सवाच्या तोंडावर निर्णय घेऊन जाहीर केले आहे. मात्र भक्तांच्या भावनेचा विचार न करता एकतर्फी निर्णय घेतल्याने अनेकांनी नापसंती व्यक्त केली आहे.

प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या अमळनेर मधील संत सखाराम महाराजांचा यात्रोत्सवाला पावणे तीनशेवर्षांची परंपरा आहे. म्हणूनच या यात्रोत्सवला लाखो भाविक हजेरी लावून दर्शन घेतात. यावर्षीं संस्थानने किरकोळ बदल आणि भाविकांच्या सुरक्षेचा, भावनेचाआणि श्रद्धेचा नावाने सुरुवातीला परंपरेप्रमाणे दोराने काही अंतर रथ ओढून नंतर ट्रॅक्टरने रथ ओढण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्यासाठी संस्थानने ठराविक जणांना बोलावून घेतला आहे. खरे तर येथील आमदार, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास घेऊन निर्णय घेणे अपेक्षित होते. यात्रोत्सवाचे वाडी संस्थान जरी संयोजन करीत असली तरी हा विषय भाविकांच्या श्रद्धेचा आहे, त्यांच्या भावानांचा आहे. याचा कुठेही विचार केला गेलेला नाही. अमळनेरचा रथ हा दोराने ओढला जातो, हे येथील भाविक पिढ्यांपिढ्या सांगत आले आहेत. जिल्हाभरातून अनेक भाविक रथोत्सवाला हजेरी लावत असताना मात्र ह्या निर्णयामुळे अनेकांचा उत्साह मालवणार असून आधीच गर्दी कमी होत असताना हा निर्णय यात्रोत्सवाच्या मुळावरच घाव घालणारा ठरू नये. या एकतर्फी निर्णयाने आता रथ ट्रॅक्टरने ओढला जातो, असे पुढच्या पिढीला सांगावे लागणार आहे. दाक्षिणात्य राज्यात शेकडो वर्षाची परंपरा बाळगत आजही दोराने रथ ओढला जातो. मग सुरक्षेचे कारण देऊन अमळनेरच्या रथोत्सावासाठी ती भिती का बाळगली जात आहे. पावणेतीनशे वर्षाच्या इतिहासात कधीही मोठी दुर्घटना घडलेली नाही, कारण येथील भाविक, नागरिक आणि कान्याकोपऱ्यातून येणारा भाविक हा समजदार असतो. आणि चुकीचा प्रकार आढळल्यास भाविक व प्रशासनाने आतापर्यंत सक्षम भूमिका पार पाडली आहे. हा निर्णय घेणे म्हणजे प्रशासनावर दाखवलेला अविश्वास असल्याचे बोलले जात आहे. या यात्रोत्सवाला पावणेतीनशे वर्षाची परंपरा राहिली आहे. याचा विचार वाडी संस्थाने केला पाहिजे. किरकोळ बदलच्या नावाखाली संस्थाने काही अंतरापर्यंत दोराने रथ ओढू असे म्हटले असले तरी प्रत्येक भाविक त्यावेळी उपस्थित राहिल असे नाही, येणारा प्रत्येक भाविक किमान दोराल स्पर्श करून पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करतो. आता दोरच राहणार नाही तर प्रत्येक भाविक रथाला स्पर्श करण्यासाठी धाव घेईल. तर अधिक गर्दी होऊन मोठा अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ दोराला स्पर्श करून भाविक यात्रोत्सवाचा आनंद लुटतात. या निर्णयामुळे भाविकांना रथला प्रदक्षिणा घालता येईल, असे संस्थानला वाटत आहे. परंतु प्रत्यक्षात ते कसे शक्य आहे. याच्याने उलट गर्दी झाली तर पोलिस प्रशासनावरील तान वाढून यात्रेला गालबोट लागण्याची शक्यताच अधिक आहे. त्यामुळे हा किरकोळ बदल नाही, तर खूप मोठा बदल आहे, संस्थांचे गादीपती प.पू. संत प्रसाद महाराज यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.



