
बोरी नदीच्या पात्रात पाणीच पाणी झाल्याने दुकानदारांची धावपळ
अमळनेर : तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले असून बोरी नदीच्या पात्रात पाणीच पाणी झाल्याने दुकानदारांची धावपळ उडाली तर वीज पडून कान्हेरे व फापोरे येथील चार बैल ठार झाले आहेत.

१६ रोजी दुपारी साडे चार वाजता अचानक वादळी पावसाला सुरुवात झाली. कन्हेरे येथे शोभाबाई ज्ञानेश्वर पाटील व ज्ञानेश्वर धनराज पाटील यांच्या गट नंबर १२/१ मध्ये वीज पडून बैलजोडी ठार झाली तर फापोरे येथे प्रकाश मोतीराम पाटील यांच्या शेताजवळ असलेल्या घराबाहेर बांधलेल्या बैलजोडी च्या अंगावर वीज पडल्याने बैल ठार झाले. तसेच शेतांमध्ये देखील पाणीच पाणी साचल्याने उन्हाळी बाजरी ,मका या पिकांवर परिणाम झाले आहेत. शहरात पाणीच पाणी झाले. शहरातील नाल्यांना पाणी आल्याने नगरपालिकेसमोरील रस्त्यावर तलाव साचला होता. तर नाल्यात कचरा अडकल्याने विप्रो बोगद्यात पाणी साचले होते बराच वेळ वाहतूक खोळम्बली होती. पालिकेचे आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे यांच्या पथकाने मोटारीने पाणी उपसून कचरा साफ केल्याने नाला सुरळीत वाहू लागला.

त्याचप्रमाणे यात्रेत मीना बाजारात पाणी साचल्याने दुकानदारांची धावपळ उडाली. पाळणे व काही दुकानदारांनी आपले साहित्य आवरायला सुरुवात केली होती. कपडे ,बाहुल्यांचे दुकान व खाद्यपदार्थांची दुकाने यांची तारांबळ उडाली होती. कापडी आवरणांवर ताडपत्र्या टाकल्या गेल्या. दोन तीन दिवसांपासून चिखलामुळे यात्रेत गर्दी कमी झाली. यंदा व्यवसायावर परिणाम झाल्याने दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी प्रत्यक्ष बोरी पात्रात जाऊन साफसफाई करून घेतली.

