
अमळनेर:- ‘सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षीस वितरण सोहळा २०२६’ या प्रतिष्ठित कार्यक्रमात ‘महादर्पण’चे मुख्य संपादक रवींद्र मोरे यांना राज्यस्तरीय ज्ञानवंत पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा मानाचा पुरस्कार त्यांना रविवार, १५ फेब्रुवारी रोजी जळगाव येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.
जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माजी डायट प्राचार्य निलकंठ आप्पा गायकवाड असतील, तर अध्यक्षस्थानी जळगावचे आमदार राजुमामा भोळे, नवनिर्वाचित महापौर दिपमाला काळे आणि माजी महापौर जयश्री महाजन राहणार आहेत. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती लाभणार आहे.
पत्रकार रवींद्र मोरे यांनी ग्रामीणबरोबरच शहरी भागातील प्रश्न, सामाजिक, राजकीय उपक्रम, तसेच जनसामान्यांच्या समस्या यांवर सातत्याने लेखणी चालवून पत्रकारितेचे सामाजिक भान जपले आहे. सत्य, निष्पक्षता आणि जनहितासाठी झटणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेत आयोजक संस्थांनी त्यांना राज्यस्तरीय ज्ञानवंत पत्रकार पुरस्काराने गौरविण्याचा निर्णय घेतला आहे.
या सन्मानामुळे जळगाव जिल्ह्यातील पत्रकार व समाजातील विचारवंत वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आयोजक जनमत प्रतिष्टानचे अध्यक्ष पंकज नाले व मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. निताताई मंगलसिंग सोनवणे यांनी मोरे यांच्या कार्याचे कौतुक करत “हा सन्मान त्यांच्या माध्यमातून सत्यनिष्ठ पत्रकारितेला मिळणारा आदर आहे,” अशी भावना व्यक्त केली.




