
गलवाडे बु. येथील दांपत्याने गावपरिसरात लावली पाच वडाची रोपे…
अमळनेर:- वटसावित्री पौर्णिमेला पूजेसाठी वडाचे झाड शोधत महिला वर्गाला भटकंती करावी लागते त्यामुळे गलवाडे बु. येथील बडगुजर दांपत्याने गाव व परिसरात पाच वडाची रोपे लावली आहेत.

वटसावित्री पौर्णिमेला महिला वडाची पूजा करतात,मात्र वडाचे झाड शोधण्यासाठी पूजेचे ताट घेऊन महिलांना इतरत्र भटकावे लागते. यापुढे गावातील महिलांना हा त्रास होऊ नये यासाठी गलवाडे बुद्रुक येथील गोपाळ पंडित बडगुजर व त्यांची पत्नी शुभांगी बडगुजर यांनी पाच जून रोजी पाच वडाची रोपे घेऊन आपल्या गाव परिसरात लावली आहेत. वडाच्या झाडाचे महत्व अगदी पुराणात सांगितले आहे, सर्वाधिक प्राणवायू देणारे झाड म्हणजे वड होय,वडाची सावली देखील दाट पडते त्यामुळे ऐन उन्हाळ्यात येणारा वट सावित्री पौर्णिमा साजरा करण्यासाठी वडाच्या झाडाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, हे ओळखून बडगुजर दाम्पत्याने येत्या पावसाळ्यात देखील वडाची आणखी रोपे लावण्याचा मानस व्यक्त केला आहे.




