
अण्णाभाऊंच्या साहित्यातून मौलिक गुणांची शिकवण:- डीवायएसपी नंदवाळकर…
अमळनेर:- अण्णाभाऊ साठे म्हणजे साहित्यातील अनमोल हिरा होत, पीढीजात काहीच साहित्याचा वारसा नसतांना अफाट ग्रंथरचना करणे हे कठीण काम अवघ्या 49 वर्ष मिळालेल्या आयुष्यात करणे अशक्य काम होते. असे प्रतिपादन डी वाय एस पी सुनील नंदवळकर यांनी अमळनेर येथे केले.
अमळनेर येथे अण्णा भाऊ साठे यांची १०३वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांनी स्मारकस्थळी उपस्थिती देत अभिवादन केले. यावेळी डीवायएसपी सुनील नंदवळकर यांनी सांगितले की, शिक्षण न घेता साहित्य लिखाण करणे हे विश्वास न बसणारे वाटते परंतू खडतर मेहनत, जिद्द, चिकाटी असल्याने अण्णाभाऊ साठे यांनी करून दाखविले. सर्वांना अशी प्रतिभेची देणगी लाभत नाही. संत तुकाराम, कबीर, गाडगेबाबा, बहिणाबाई व अण्णाभाऊ साठे सारखे अनुभवाला मूल्यांची जोड देणारे प्रतिभासंपन्न व्यक्तिच करु शकतील. संदीप घोरपडे यांनी “अण्णाभाऊ साठे कवी, शाहीर, लोक कलावंत, प्रबोधनकार, लेखक, पत्रकार, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, वक्ते, भाष्यकार अशा साहित्याच्या बिरुदावली कमी पडतील इतके अथांग त्यांचे चरित्र सांगता येईल, असे मत व्यक्त केले.
अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील नायक हा गरिबीने पछाडलेला, दारिद्र्य, अन्नासाठी वणवण असलेला दिसतो. अपार कष्ट, उपासमार परंतू स्वाभिमान असलेला दिसतो. असंख्य वेदनेच्या तप्त राखेत जगणारा त्यांचा नायक नैतिकता, समाजहित जपणारा दिसतो असे ऍड ललिता पाटील यांनी मनोगतात सांगितले. फकिरा हा नायक वाटेगावचा मांग समाजाचा समाजकार्य करणारा बंडखोर, इंग्रजांचा खजिना लुटणारा भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणारा नेता. तो इंग्रजांच्या खजिन्यावर डल्ला करून दीन, दलित, दुबळ्या लोकांना मदत करतो. गावातील लोकांना त्रास देणारे गावगुंड यांना वठणीवर आणणारा लोकनायक, असा नायक की त्याच्या जगण्याचा हेवा वाटावा असा अस्सल नायक, पत्री सरकार म्हणून ओळखले जाणारे क्रांतिसिंह नानापाटील यांच्या चळवळीचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले होते. त्यांच्या कृतीचा परिणाम असलेला सत्यशोधक, परोपकारी नायक अण्णाभाऊ साठेंनी फकिरात उभा केला, असे मत प्रा अशोक पवार यांनी केले.
यावेळी मा आ स्मिता वाघ, प्रांताधिकारी महादेव खेडकर, मा जि प सदस्या जयश्री पाटील, ॲड ललिता पाटील, पोलिस निरीक्षक विजय शिंदे,ए पी आय शितलकुमार नाईक,डॉ अनिल शिंदे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, संजय चौधरी, डॉ निखील बहुगुणे, डॉ दिनेश पाटील,डॉ परदेशी, प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, दीपक भालेराव,डॉ विलास महाजन, वसंत बैसाणे,संचालक सुभाष पाटील, डी ए धनगर सर, संतोष पाटील,संदीप सैदाणें, हिरामण कांबळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कढरे गुरुजी यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वितेसाठी सुरेश कांबळे, समाधान मैराळे, विजय गाढे, नूर खान,डॉ राजू कांबळे,जितू कढरे यांनी परिश्रम घेतले.







