
६ तास चालली शस्त्रक्रिया, गर्भ पिशवीच्या बाजूला होती अंडकोषाची गाठ…
अमळनेर:- आधीच शस्त्रक्रिया झालेली होती कठीण त्यात पोटातील आतड्यांची गुंतागुंत वाढली, आतडेही फाटले तरीही डॉ.अनिल शिंदेंनी ही आव्हानात्मक व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आपल्या कौशल्याने यशस्वी केल्याने एका 29 वर्षीय महिलेला जीवदान मिळाले आहे.

तब्बल 6 तास ही शस्त्रक्रिया चालली, यानिमित्ताने शस्त्रक्रिया कितीही कठीण असो डॉ.शिंदे ती करणार म्हणजे यशस्वी होणारच हे पुन्हा डॉ.शिंदे यांनी सिद्ध केले आहे. दरम्यान सदर पीडित महिलेच्या गर्भ पिशिवीच्या बाजूला अंडकोषाची गाठ होती. आधीच या महिलेचे 2 वेगवेगळे ऑपरेशन झाले होते त्यामुळे पोटात आतडे चिकटलेले होते. प्रत्यक्षात गर्भपिशवीच्या बाजूला अंडकोषाची गाठ असल्याने उपचार्थ शहरातील एका रुग्णालयात दाखल झाली होती. त्याठिकाणी धुळे येथील दुर्बिणीचे ऑपरेशन मधील स्त्री रोग तज्ञ ऑपरेशन करत असताना आतड्यांची गुंतागुंत निर्माण झाली व लहान आतड्याला दुखापत झाली, त्यामुळे शस्त्रक्रिया दुर्बिणीच्या सहाय्याने करणे शक्य नव्हते, म्हणून ओपन शस्त्रक्रिया करावी लागली. म्हणून डॉ.अनिल शिंदें यांना या ठिकाणी मदतीसाठी बोलावण्यात आले. त्यात पोटात आतड्यांची मोठी गुंतागुंत असल्याने ते मोकळे करतांना 4 ठिकाणी आतडे फाटले, त्यामुळे सदर 4 ठिकाणी आतडे कट करून पुन्हा जोडावे लागले.
खरे पाहता सदर शस्त्रक्रिया आव्हानात्मक व गुंतागुंतीची असल्यामुळे ती अतिशय संथ गतीने व लक्ष देवून करावी लागते. यामुळे सुमारे 6 तास ही शस्त्रक्रिया चालली. यात डॉक्टरांचे ही कौशल्य पणाला लागते. मात्र डॉ.अनिल शिंदे यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर सदर महिलेची शस्त्रक्रिया यशस्वी करून त्या महिलेला जीवदान दिले. पुढील दक्षता म्हणून त्या महिलेला ८ दिवस अतिदक्षता विभागात ठेवून नंतर परत ८ दिवस सर्वसाधारण रुमला ठेवून सुखरूपपणे तिची सुट्टी करण्यात आली. यासाठी डॉ.अनिल शिंदे, डॉ.मिलिंद पवार धुळे, डॉ.मनिषा पाटील, डॉ.संदीप जोशी, डॉ.अलीम शेख,डॉ परेश पाटील, डॉ हर्षल संदानशिव,डॉ खुशवंत भदाणे यांनी परिश्रम घेतले तर अवघड असे भुल देण्याचे काम पारोळा येथील भूलतज्ञ डॉ.महेश पाटील यांनी केले
तर रुग्णाचा जीव वाचू शकतो…..
कोणत्याही शस्त्रक्रिया करताना गुंतागुंत होवू शकते, परंतु असे झाल्यास डॉक्टरांच्या हातात काहीच नसते, विश्वास ठेवणे हेच महत्वाचे असते. मात्र डॉक्टरांच्या लक्षात आल्यावर त्याला योग्य पद्धतीने हाताळणी केल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. गुंतागुत झाल्यास रुग्णाच्या नातेवाईकांनी गैरसमज न करता डॉक्टरांवर विश्वास ठेवून त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार घ्यायला हवे, त्यामुळे रुग्णाचा जीव वाचू शकतो अशी माहिती डॉ.अनिल शिंदे यांनी दिली.




