
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- उन्हाळा संपत आल्याने शेतकऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी मशागतीचे कामे सुरू केले असून शेतातील काडी कचरा आग लावून नष्ट केले जात असून मात्र रस्त्याच्या कडेला शेतीचे क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांकडून बांधावरचे व रस्त्याच्या कडेला असलेले गवत व काडी कचरा पेटवले जात असून सावखेडा परिसरात रस्त्यावर आगीचे डोंब व धुराचे लोट पसरत असल्याने वाहनांचे अपघात होण्याची संभावना होत आहे.
सध्या कडाक्याच्या उन्हाळा व त्यात उच्च तापमानाच्या लाटेमुळे जनता भरळून निघत आहे. आणि आता पावसाळ्यापूर्वी शेतीच्या मशागतीचे कामे सुरू असल्याने शेती सुपीक करण्याची तयारी सुरू झालेली आहे.शेतातील काडी, कचरा व इतर घाण शेतात पेटवली जात आहे.मात्र रस्त्याच्या कडेला शेतीचे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांकडून रस्त्याच्या कडेला असलेल्या गवत,काडी कचरा व बाभळाची झाडे पेटवली जात आहे.त्यामुळे त्या पेटत्या आगीचे डोंब व धुळाचे लोड रस्त्यावर येत असून आगीची उष्णता थेट रस्त्यावर येत आहे.परिणामी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना आपली वाहने थांबवावी लागत असून धुरामुळे समोरची वाहने दिसत नाही म्हणून वाहने थांबवून वाहनांच्या रांगा लावल्या जातात तर काही वाहनधारक तशाच आगीच्या दाहकतेत व धुरात वाहने पास करीत असतात त्यामुळे वाहनांच्या अपघात होण्याची संभावना होत आहे. असाच प्रकार सोमवारी रोजी दहा वाजेच्या सुमारास सावखेडा येथील शेतकऱ्याने सावखेडा शिवारात केल्याचे दिसून आला. शेतकरी आग लावून तसाच पाहत राहिला मात्र त्याचा परिणाम वाहन धारकांना सहन करावा लागला. अक्षरशः वाहनधारकांना आपली वाहने उभी करावी लागली तर काही वाहने तशाच आगीच्या दाहकतेत निघून गेले मात्र आगीची उष्णता लांब लांबपर्यंत पोहोचत होती यामुळे वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागला.आणि अशा आगी लावण्याच्या प्रकाराने रस्त्यावरील लावलेली झाडे व असलेली झाडे जळून नष्ट होत असून यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास देखील होत आहे. तरी रस्त्याच्या कडेला शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला असलेली काटेरी झुडपे व गवत पेटवू नये व सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील याची जाणीव ठेवून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील काटेरी झुडपे व वाढलेले गवत साफ करून घ्यावे जेणेकरून शेतकऱ्यांकडून असले आगीचे प्रकार केले जाणार नाहीत असे आवाहन पर्यावरण प्रेमी सागर मोरे यांनी केले आहे.

