
श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी स्वयंसेवकांना केले मार्गदर्शन…
अमळनेर:- जीवनात मोठे यश प्राप्त करायचे असेल तर मेहनती शिवाय पर्याय नाही, आपणच आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार असून स्वतः घाव सहन केल्याशिवाय सुंदर मूर्ती घडु शकत नाही असे प्रतिपादन अमळनेरचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी केले.
मारवड येथील कै न्हानाभाऊ म.तु. पाटील कला महाविद्यालयाच्या बोरगाव- गोवर्धन येथे झालेल्या राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाला योग्य दिशा व श्रमाचे वळण लावण्यासाठी श्रमसंस्कार शिबिरांची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी या श्रमसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनाला पैलू पाडून घ्यावेत व जीवनात मेहनतीच्या बळावर फार मोठे यश प्राप्त करून आपला व आई वडिलांचा आणि समाजाचा उद्धार करावा. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील होते. शिबिराचे उद्घाटन भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त जवान गोविंदराव साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जवान गोविंदराव साळुंखे यांनी देखील विद्यार्थ्यांना देशाची सेवा करण्याचे आवाहन करून भारत मातेचे खरे सुपुत्र व्हा असा उपदेश केला. व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.मनिष करंजे, ग्रामविकास शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष देविदास साळुंखे, सचिव देविदास पाटील, यांसह सर्व संचालक मंडळ , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंतराव देसले, मारवडच्या नूतन लोकनियुक्त सरपंच आशाबाई भिल, उपसरपंच भिकन पाटील, माजी जि. प. सदस्य शांताराम पाटील, प्र. डांगरीचे माजी सरपंच अनिल सिसोदे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जी. बी. शिंदे, अरुण साळुंखे, हरिभाऊ मारवडकर, भैरवनाथ दूध उत्पादक सोसायटीचे सचिव गुलाब पाटील, मधुकर पाटील, पत्रकार डॉ. विलास साळुंखे, वसंतराव पाटील, ग्रा.पं. कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटील, मारवड हायस्कूलचे प्राचार्य लोटन चौधरी, करणखेडा विद्यालयाचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम सोनवणे यांसह विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या सात दिवसीय हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात 50 स्वयंसेवक सहभागी असून ‘युवकांचा ध्यास – ग्राम शहर विकास’ ही शिबिराची मध्यवर्ती संकल्पना घेण्यात आली आहे असे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी कळविले आहे. आभार प्रा.डॉ.वाघमारे यांनी मानले.







