
अवकाळी पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य, रस्त्यावर चालणेही अवघड…
अमळनेर:-येथील भालेराव नगर परिसरातील पाटील गढी परिसरात कच्या रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली असून दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरून नागरिकांना रस्त्यावर चालणेही अवघड झाले आहे. त्यातच भुयारी गटाराच्या कामामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत.
परिसरातील नागरिक नियमित कर भरणारे असताना आम्ही रस्त्यापासून वंचित का? असा सवाल नागरिकांनी केला आहे. नागरिकांची प्रचंड मोठी वसाहत याठिकाणी असून आतापर्यंत पक्के रस्तेच झाले नसल्याने बाराही महिने नागरिकांची कसरत होत असते. विशेष करून पावसाळ्यात कच्चे रस्तेच अदृश्य होऊन रस्त्यावर सर्वत्र चिखल माखत असतो. यामुळे अबालवृद्ध व शाळकरी मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत असतो. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने येथील नागरिक अत्यंत त्रस्त झाले असून कोणी त्यांचा प्रश्न सोडवेल का ? असा प्रश्न त्याना पडला आहे. पालिकेकडे अनेकदा निवेदन देऊनही त्याचा उपयोग झाला नसून आम्हाला काहीच नको, पालिकेने फक्त रस्ता द्यावा अशी विनंती येथील नागरिकांनी केली आहे.




