
जो इतरांच्या संवेदना जाणतो तो खरा साहित्यिक:- डॉ. श्रीकांत पराडकर
अमळनेर:- “वेद वेदना संवेदना व साहित्य या क्रमाने साहित्यकार आपले साहित्य लिहीत असतो. वेदातील विज्ञान त्याला इतरांच्या वेदनांचा ठाव घेऊन त्या प्रती संवेदना निर्माण करून साहित्यिक आपले कार्य करत असतो ते खरे साहित्य” असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री डॉ. श्रीकांत पराडकर यांनी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित प्रताप तत्वज्ञान केंद्र अमळनेर व अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात निकिता भागवत यांनी आपल्या सुमधूर स्वरांनी सरस्वतीची प्रार्थना म्हणून सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ.भा.सा.प. महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र पाठक यांनी केले तर या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव के एफ गायकवाड व राज्यपाल नियुक्त सभासद दिलीप पाटील हे उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी के एफ पवार, दिलीप दादा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत पराडकर हे होते. यावेळी या कार्यक्रमास आर्थिक सहाय्य करणाऱ्या हरी भिका वाणी, प्रदीप अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला तसेच अ.भा.सा.प. मासिकाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ.भा.सा.प. देवगिरी प्रांत कार्याध्यक्ष प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रताप तत्वज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर दिलीप भावसार यांनी मानले. या साहित्य कार्यशाळेस महाराष्ट्रातील सुमारे 50 साहित्यिक उपस्थित होते.







