
अमळनेर:-शहरातील सराफ बाजार परिसरात सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा सुंदर संदेश देणारा आगळावेगळा उपक्रम पाहायला मिळाला. ईलाही मस्जिदीजवळ बाराभाई ऊर्फ अंदरपुरा मोहल्ला ट्रस्टच्या वतीने श्री संत सखाराम महाराजांच्या पालखीचे उत्साहात व भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.

यावेळी ह.भ.प. श्री प्रसाद महाराज यांचा सन्मान ट्रस्टचे अध्यक्ष अफसर पठाण यांच्या हस्ते करण्यात आला. नगरसेवक नविद शेख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू असून, यामुळे समाजात जातीय सलोखा टिकून आहे आणि पुढेही कायम राहील.”
ह.भ.प. प्रसाद महाराज यांनी आपल्या मनोगतात हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रेरणादायी उदाहरणे सांगत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या विचारांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व पोलीस प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. तसेच बाराभाई ट्रस्टचे उपाध्यक्ष आरिफ मेमन, अशफाक शेख, अहेतेशाम खान, रियाज ठेकेदार, मुजाहिद शेख यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.या उपक्रमातून अमळनेर शहरातील सामाजिक एकात्मता, परस्पर सन्मान आणि बंधुभाव यांचे उत्तम उदाहरण पुन्हा एकदा समोर आले.




