
अमळनेर:- शहरात संत निरंकारी मिशन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त निरंकारी सदगुरु माता सुदिक्षा महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या मार्गदर्शनाने रविवारी ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान सकाळी ७ ते १२ या वेळेत संपन्न झाले.
या अभियानामध्ये अमळनेर येथील सिंधी कॉलनी परिसर सह वर्णेश्वर महादेव मंदिर परिसरात प्लास्टिक कचरा, सेंद्रिय कचरा, (निरुपयोगी) पदार्थ, अनावश्यक झुडपे, स्वच्छ करण्यात आले. तसेच बंधाराकाठचा परिसर स्वच्छ करण्यात आला. संत निरंकारी मिशनचे श्रीचंद निरंकारी यांनी या परियोजनेविषयी माहिती देताना सांगितले, की ही परियोजना संपूर्ण भारतदेशात 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 730 शहरांमध्ये जवळपास 1100 हुन अधिक ठिकाणी राबविण्यात आली.त्या प्रमाणे अमळनेर शहरात देखील 2 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून सर्व सुका कचरा नष्ट करण्यात आला. त्यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच अन्य निरंकारी भक्तगण 100 हून अधिक संख्येने सहभागी झाले होते. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी आपल्या कार्यकालात समाज कल्याणाचे अनेक उपक्रम राबवले, त्यामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान यांची सुरुवात प्रमुख आहेत. त्यांच्याच शिकवणूकीतून प्रेरणा घेत दरवर्षी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या निर्देशनानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून यावर्षी अमृत परियोजनेचे आयोजन करण्यात आले.







