
ग्रामपंचायतीकडून कायमच दुर्लक्ष झाल्याने रहिवाश्यांचा संताप…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथील ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून ग्राम पंचायत इमारतींच्या पाठीमागे असलेला भोईवाडा व जुनी ग्राम पंचायत इमारतीच्या मागील भोई वस्तीत अजूनही काँक्रीटीकरण रस्ते नसल्याने सदरील वस्त्यांमध्ये रहिवासी असणाऱ्या ग्रामस्थांना चिखलात पाय तुडवावे लागत असून ग्राम पंचायतीच्या स्थापनेपासून कायमच भोई समाजाच्या वस्त्यांमध्ये दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप रहिवाशांमधून होत आहे.
गावात जवळपास 90 टक्के रस्त्यांचे काँक्रीटीकरण झालेले असून काही भागांत तर दोनवेळा काँक्रीटीकरण झाले असून देखील ग्रामपंचायतीकडून अद्यापही दोन्ही भोईवस्त्यामधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण हेतुपुरस्सर करण्यात आलेले नाही आहे. ग्राम पंचायतीच्या मागील भोईवस्तीत पावसाळ्यात सदर रहिवाशांना चिखलात मार्ग काढावा लागत असतो.गटारींचे पाणी वस्त्यात शिरते, गटारींचे पाणी टाकलेल्या ढाप्यावरून वाहत असून दूषित पाण्याचे डबके तयार होतात व रहिवाशांना येण्या-जाण्यास रस्ता नसतो. आजपर्यंत गटारी सुद्धा बांधल्या गेल्या नाही. गल्लीत काही रहिवाशांनी किरकोळ अतिक्रमणे केलेली असून गल्ली अरुंद झालेली आहे.सदर परिसरात वृद्ध महिला पुरुष व लहान बालकांची संख्या जास्त असून पावसाच्या चिखलाने त्यांच्या पडण्याची भीती नाकारता येत नाही. मागील पंचवार्षिक काळात दोन्ही भोई वस्त्यात काँक्रीटीकरण करण्याचे प्रस्तावित केले होते पण काही व्यक्तीकडून मंजूर रस्त्यांची पळवापळवी झाल्याने व इतरत्र वळविले गेल्याने भोईवस्त्या पुन्हा वंचितच राहिल्या. दरवेळी फक्त निवडणूकीपुरता आश्वासने देऊन भोई समाजाच्या मतांचा लाभ घेऊन नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. ग्रामपंचायतीकडून भोई समाजाकडे हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते की काय म्हणून आजपर्यंत दोन्ही भोईवस्त्यामधील रस्ते विना काँक्रीटीकरणाचे आहे.जर येत्या काळात भोई वस्त्यांमधील दोन्ही रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले नाही तर ग्राम पंचायत मध्ये येऊन ठाण मांडू असा पवित्रा सदर रहिवाशांनी घेतला आहे.

