विभागीय रेल्वे व्यवस्थापक, व खासदारांना दिले पत्र…
अमळनेर:- सुरत भुसावळ पॅसेंजरची लॉकडाऊनच्या आधी असणारी वेळ कायम करावी, या मागणीसाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक व खासदारांना विलास बोरसे यांनी निवेदन देत मागणी केली आहे.

सुरत-भुसावळ पॅसेंजर (क्रमांक 19005) व भुसावळ सुरत (क्रमांक 19006) दोन वर्षांपूर्वी लॉक डाऊन लागण्यापूर्वी वेळेत सुरु होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या रेल्वेचे वेळापत्रक बदलल्यामुळे अनेक सामान्य प्रवासी प्रवासाला मुकतात. त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पॅसेंजर सुरतहून अमळनेरला रेल्वे सकाळी 5 वाजता पोहचते व सकाळी 7 वाजता जळगावला पोहचते. एवढ्या सकाळी पहाटे अनेक लोकांना ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना प्रवासी वाहन उपलब्ध होत नसल्याने प्रवास करता येत नाही. अनेक शासकीय कामांना येण्यासाठी बसचा मार्ग अवलंब करावा लागतो. वाढलेली महागाई बघता आपण या रेल्वेचा वेळेत बदल करावा. तरी सदर सुरत भुसावळ पसेंजर क्रमांक 19005 रेल्वे सकाळी 7 वाजता अमळनेरला यावी आणि जळगाव हून सुरत कडे जाणारी सुरत भुसावळ पसेंजर क्रमांक 19006 रेल्वे सायंकाळी 7 वाजता जळगाव हून निघावी. तसेच आरक्षणाचे डबे दोनच ठेवावे अन्य सर्व डबे विना आरक्षित असावेत. जेणेकरून सामान्य प्रवासी या प्रवासाचा लाभ घेऊ शकतात. यातून अनेक लोक अमळनेर, टाकरखेडा, लोने, भोणे, धरणगाव, पाळधी अन्य लहान गावातून लोक जळगाव भुसावळ येथे व्यवसाय, लहान मोठी नोकरी, शैक्षणिक कामासाठी विद्यार्थी तसेच साहित्य खरेदी साठी शेतकरी बांधव येत असतात. असे विलास दिलीप बोरसे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले असून खासदार उन्मेष पाटील, व विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी या मागणीची दखल घेत कार्यवाही करावी अशी विनंती असंख्य प्रवासी बांधवांनी केली आहे.