
वावडे येथील रहिवासी, नाशिक जिल्ह्यात आहेत कार्यरत…
अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथील रहिवाशी असलेले उत्कर्ष भगवान पाटील यांना नाशिक जिल्हा परिषदेकडून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

उत्कर्ष भगवान पाटील हे ग्रामसेवक नाशिक जिल्ह्यात कार्यरत असून त्यांना ग्रामपंचायत जाखोरी ता. नाशिक येथील उत्कृष्ट कामाबद्दल आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन सीईओ आमिषा मित्तल जिल्हा परिषद नाशिक यांच्या हस्ते गौरवण्यात आले. उत्कर्ष पाटील यांनी ग्रामपंचायत जाखोरी येथे कार्यरत असताना छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल व ग्रामपंचायत कार्यालयाची प्रशासकीय इमारत बांधणे, पुरुष व महिलांसाठी व्यायाम शाळा बांधली. वनक्रांती उपक्रम अंतर्गत 5000/- देशी व फळझाडे लावून कोरोना महामारी काळात 5 विधवा महिलांना रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून दिला. मुलांसाठी खेळाचे क्रिडांगण, स्मशानभूमी, डिजिटल शाळा व अंगणवाडी करणे. तसेच विचारक्रांती वाचनालयाच्या माध्यमातून तरुणांना हक्काचं व्यासपीठ मिळवून दिले. ग्रामपंचायत जाखोरीला महाराष्ट्र शासनाचा तालुका व जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळवून दिला. सन 2019 मध्ये पंडित दिन दयाल उपाध्याय पंचायत राज सशक्तीकरण केंद्रीय पुरस्कार ग्रामपंचायत जाखोरीला मिळाला. त्यामुळे गावाला एकूण 38/- लाख रुपये बक्षीस रक्कम मिळाल्यामुळे गाव विकासाला हातभार लागला.सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पालकमंत्री दादा भुसे हे उपस्थित होते. जिल्हा परिषद नाशिकचे सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उत्कर्ष पाटील यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








